गीतेचे मराठी काव्यरूपात – श्रीयुत अनिल बोकील – अध्याय ४

॥ *अध्याय ४* ॥
*ज्ञानकर्मसंन्यासयोग*

या अध्यायात भगवान श्रीकृष्ण योगमार्गाचे तत्त्वज्ञान पुढे नेतात. आरंभी ते योगमार्गाची दीर्घ परंपरा सांगतात. ते म्हणतात – ” मी स्वतः हे ज्ञान सूर्याला, सूर्याने मनूला आणि मनूने इक्ष्वाकूला दिले होते आणि परंपरेने ते राजर्षींना माहीत होते. मात्र नंतर अनेक वर्षे उलटून गेल्यावर ते ज्ञान पृथ्वीवरून नष्ट झाले. तेच उत्तम ज्ञान मी तुला आता सांगतो आहे.” अर्जुनाला प्रश्न पडतो की सूर्यजन्म तर अती पुरातन आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म तर त्यानंतरचा. मग भगवान श्रीकृष्णांनी सूर्याला हे शिकविले यावर कसा विश्वास ठेवणार?

अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण त्यांचे दिव्य जन्म आणि कर्म याविषयी सांगतात आणि त्यामागचे कारणही उलगडून दाखवितात. परमात्म्याचे हे सत्यस्वरूप ज्ञानयज्ञाने जो जाणतो त्याची कर्मबंधने तुटून जातात आणि तो माझ्याशी एकरूप होतो हेही ते समजावितात.

चातुर्वर्ण्य, कर्म, अकर्म, विकर्म अशा अनेक संकल्पना उलगडून सांगताना भगवान श्रीकृष्ण ज्ञानी किंवा पंडित कोणाला म्हणावे आणि कशा मनोवृत्तीने कर्म करणाऱ्या पुरुषाला कर्माचे बंधन होत नाही ते स्पष्ट करतात.

यज्ञ ही संकल्पना पुन्हा एकदा इथे येते. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ आणि ज्ञानयज्ञ यातील भेद समजाविताना ज्ञानयज्ञाची पर्यायाने ज्ञानाची श्रेष्ठता भगवान श्रीकृष्ण पटवून देतात. जो श्रद्धावान, जितेंद्रिय आणि ज्ञानरत आहे त्यालाच हे ज्ञान प्राप्त होते आणि त्याचे सर्व संशय नष्ट होऊन तो कर्मबंधनातून मुक्त होतो. अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या मनात ठाण मांडून बसलेला संशय ज्ञानाच्या तलवारीने छिन्न करून टाक असा उपदेश करतात.

श्री भगवानुवाच
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥ ४.१ ॥

श्री भगवान उद्गारले
अविनाशी हा योगमार्ग जो तो मी कथिला त्या सूर्याला ।
सूर्याने तो कथिला मनुला आणि मनूने इक्ष्वाकूला ॥ ४.१ ॥

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः ।
स कालेनेह महता योगो नष्टः परन्तप ॥ ४.२ ॥

[श्री भगवान उद्गारले]
योगमार्ग हा राजर्षींना परंपरेने माहित होता ।
नष्ट जाहला पृथ्वीवरुनी अनेक वर्षे सरता सरता॥ ४.२ ॥

स एवायं मया तेऽद्य प्रोक्तः पुरातनः ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥ ४.३ ॥

[श्री भगवान उद्गारले]
तूच प्रियसखा आणि भक्तही म्हणून तुज मी आज खरोखर ।
त्याच सनातन मार्गा कथिले रहस्य उत्तम आहे ते तर ॥ ४.३ ॥