पेशवाईतील स्त्रिया भाग ९

पेशवाईतील स्त्रिया – भाग ९

जिऊबाई फडणवीस

पेशवाई म्हणजे फक्त भट घराणे नसुन … तो संपुर्ण काळ आणि त्या काळातील इतर व्यक्ती तितक्याच महत्वाच्या …त्यामुळे पेशवाईतील स्त्रिया म्हणजे जशा भट घराण्यातील स्त्रिया किंवा माहेरवाशिणी आल्या तशाच कारभारातील इतर पुरुषांच्या पत्नी पण यायला हव्यात .. प्रत्यकीचा आयुष्याचा झगडा सारखाच ….

पेशवाईतील प्रचंड नावाजलेली व्यक्ती … एक मुत्सद्दी …पेशवाईतील साडे तीन शहाण्या पैकी अर्धे शहाणे म्हणजे नाना फडणवीस !

नानांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ ला साताऱ्यात झाला आणि मृत्य १३ मार्च १८०० ला पुण्यात झाला …५८ वर्षाचे आयुष्य , हयातीत पेशवाईतील अनेक स्थित्यंतरे पाहिली , राजकारण नुसते पाहिलेच नाही तर सक्रिय सहभाग घेत राज्याच्या भल्या करता जे करता येईल ते करत गेले … उत्तर आयुष्यात नशिबी कैद आली.. अनेक चढ उतार अनुभवलेलं असं आयुष्य.

असे हे नाना म्हणजे वादळी व्यक्तिमत्व !

आयुष्यत नऊ लग्ने केली , त्या काळात अनेक भार्या असणे यात गैर असे काही नव्हते. यातील बहुतेक स्त्रिया सावकार घराण्यातल्या होत्या … दुर्दैवाने सगळ्याजणी नानांच्या हयातीत वारल्या , अपवाद फक्त जिऊबाईंचा ….ही नानाची नववी पत्नी , मुरुडचे गोपाळभट वैशंपायन यांची ही मुलगी , नानांच्या मृत्युच्या वेळेस तिचं वय होते केवळ नऊ !!!

नाना गेले तेंव्हा निपुत्रिक होते , इतर लग्नातुन त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये झाली पण लवकर देवाघरी गेली …

नानाच्या पाश्च्यात जिऊबाई म्हणजे नऊ वर्षाची कोवळी पोर होणार होती नानांच्या प्रचंड संपत्तीची मालकीण …त्यावेळेस पेशवा होता दुसरा बाजीराव आणि दुसऱ्या बाजीरावाचे कर्तृत्व (?) बेताचेच , पेशवाई बुडायला कारणीभुत झालेले … बाजीराव आणि नाना मधुन विस्तव जात नव्हता आणि त्यामुळे त्याचा नानाच्या संपत्ती वर डोळा होता …पण बाजीरावाला जिऊबाई वस्ताद भेटली , तिने नानाच्या इतर साथीदारांना हाताशी धरले आणी परिस्थितीला धैर्याने तोंड दिले … नानाच्या मृत्यु नंतर वाड्यातील सेवकांनी ” तलबे ” करता नानांचे शव अडवुन धरले , तलब म्हणजे थकलेला पगार , जिऊबाईने पेशव्यांची मध्यस्थी घडवुन सेवकांचे पगार देऊन नानांचे अंत्यविधी करवुन घेतले …हे सगळे पार पडल्या नंतर बाजीरावाने नानांचे वाडे , जहागिरी , इनामे सगळे जप्त करून जिऊबाईना शनिवार वाड्यावर कैद करून ठेवले !

नानांची मुख्य संपत्ती होती लोहगड किल्ल्यावर , तिथला किल्लेदार निजसुरे नानाच्या विश्वासातला , जिऊबाई शनिवार वाडयावर कैदेत आहे हे कळल्यावर त्याने बाजीरावावर चालुन यायची तयारी केली , पण त्या पुर्वी होळकर पुण्यावर चालुन आले आणि त्यांनी जिऊबाईना कैदेतुन मोकळे करुन लोहगडावर पाठवले … जवळपास दोन वर्षे जिऊबाई शनिवार वाडयावर कैदेत होत्या .

इथुन पुढे पेशवाईला उतरती कळाच लागली , बाजीराव आणि वेस्ली म्हणजे इंग्रजांचा तह झाला , त्यात बाजीरावाने लोहगड ताब्यात घेतला , त्या वेळेस निजसुरे आणि जिऊबाईनी वेस्लीशी वेगळा करार करून खर्चाची तजबीज करून घेतली ,हे काम साधे सोपे नव्हते ब्रिटिशांशी प्रचंड पत्रव्यवहार करावा लागला जो जिऊबाईने स्वतः केला …. नाना फडणवीसांची मालमत्ता टिकवण्यासाठी पेशवे सरकारांशी निरनिराळे करार करून घेतले व नानांच्या काही मिळकती सोडवून घेतल्या.

त्यानंतर त्या पनवेलला राहु लागल्या , बाजीरावाने त्यांना बरेचदा , झाले गेले विसरून पुण्याला येऊन राहण्याची विनंती केली , पण बाजीराव पुण्यात असे पर्यंत त्या पुण्यात काही आल्या नाहीत , बाजीराव पुण्यातुन गेल्यावर काही दिवस पुण्यात येऊन राहील्या , पण पुण्यात जीव रमला नाही म्हणुन मेणवलीला नानांच्या वाड्यात राहु लागल्या ….

आयुष्यभर जिऊबाईला कष्ट उपसावे लागले , पण या सगळ्याच स्त्रिया संकटाला कधी डगमगल्या नाहीत, कायम भविष्याचा विचार करत जागल्या , म्हणुनच नानांचा वंश चालावा आणि राहिलेल्या संपत्ती ची काळजी घेण्या करता जिऊबाईंनी १८३५ ला रामकृष्ण भानु यांचा मुलगा गंगाधरला दत्तक घेऊन त्याचे नाव महादजीपंत ठेवले …..

अशी ही एका मुत्सद्याची पत्नी पेशवाईतील अनेक घडामोडी आणि स्थित्यंतरे पाहात मार्च १८५४ ला मेणवली गावात मरण पावली ….

त्यांच्या मृत्यु नंतर “ज्ञानप्रकाश” मध्ये त्यांच्याबद्दल खालील माहिती छापून आली.

“नाना फडणवीसांची पत्नी जिऊबाई या वाईजवळील मेणवली या गावी राहात होत्या. बाईसाहेब मनाने व आचरणाने निर्मळ होत्या. ब्राह्मणांचे ठायी भूतदया अंत:करणपूर्वक होती. मुख्यत्वेकरून बाईंचे घर हे ब्राह्मणांस माहेरच होते. त्यांच्या मृत्युमुळे पेशवाई कारकिर्दीतील लोकांस प्रचंड दु:ख झाले.’शिवचरित्रमाला भाग ५१
======================
पुरंदरचा दख्खन दरवाजा.
======================
पुरंदर गड बुलंद आहे बेलाग आहे। प्रचंड तर घटोत्कचासारखा आहे. असा हा गड चटकन मिळावा असा प्रयत्न दिलेरखान करीत होता. महिना उलटून गेला होता. अजूनही गड खानाला चटकन मिळत नव्हता.
अन् एक चित्तरकथाच गडाच्या दक्षिणेस काळदरीत घडली। खानानं गडाचा दख्खन दरवाजा तोफांच्या सरबत्तीने अस्मानात उडविण्याचा घाट घातला. दोन प्रचंड तोफा मोठ्या कष्टाने काळदरी या गावापासून गडाच्या या दख्खन दरवाजापासून थोड्या अंतरावर असलेल्या डोंगरमाथ्यावर चढविण्यात आल्या. खाटल्यावर पहुडलेल्या घटोत्कचानं आपला एक गुडघा उंचावावा तसा हा डोंगरमाथा दिसतो. भोवती झाडी. समोर उंचावर तो दरवाजा. हा दरवाजा जर कब्जात आला तर पुरंदरच्या थेट बाले किल्ल्यावरच आलमगिरी झेंडा लावता येईल हा दिलेरचा डाव. हे काम अत्यंत अवघड होते. पण तोफांच्या माऱ्याने दरवाजा उडवून ते साधता येईल असा खानाचा विश्वास होता. या तोफांच्या मोर्च्यावर एक मोगली तुकडी आणि दोन प्रख्यात सरदार खानाने नेमले. दाऊदखान कुरेशी आणि रसूल बेग रोजभानी हे ते दोघे. अहिमही होते. म्हणजे हा दरवाजा आता अशा तोफांच्या आणि मोगली सरदारांच्या तोंडासमोरच उभा होता. त्या मानाने दरवाजा बऱ्याच उंचीवर गडाच्या खोबणीत होता.
अन् या तोफांचा मारा दरवाज्यावर सुरूही झाला. दोन-तीन दिवस उलटले. दरवाजा पक्का होता. (अजूनही आहे.) अन् याचवेळी एका रात्री गडद अंधारातून आणि गडाच्या अंगावर असलेल्या झाडीझुडपांतून सुमारे चारशे मावळे , काळदरीकडून गडावर उंदरासारखे या दरवाजाच्या रोखाने घुसले. चढू लागले. या मावळ्यांच्या पाठीवर धान्याची आणि बारुदाची म्हणजे तोफा बंदुकांच्या दारुची लहानमोठी पोती होती. महाराजांनी राजगडावरून पुरंदरगडावर मुरारबाजींना ही रसद गुपचूप पाठविली होती. सुमारे दोनशे पोती होती. मोगली सैन्याच्या आणि तोफांच्या तडाख्यातून हे मावळे मोठ्या हिमतीने , कष्टाने आणि चतुराईने गड चढत होते. दाऊदखान कुरेशी आणि रसूलबेग रोजभानी यांना या चोरांच्या चतुराईची चुकूनही चाहूल लागली नाही. दख्खन दरवाज्यावरच्या मराठ्यांनी अचूकपणे दिंडीदरवाजा उघडला. ही मराठी कुमक आणि रसद गडात अगदी सुखरूप पोहोचली. दख्खन दरवाजा बंद झाला. मोगली तोफा उडचत होत्या.
रात्र संपली. दिवस उगवला. मुरारबाजींना ही नवीन कुमक पाहून केवढा आनंद झाला असेल नाही ? खास महाराजांनी गडाला पाठविलेली ही मदत.
अन् रात्र संपल्यावर दिवसाउजेेडी दाऊदखानला अन् रसूलबेगला बातमी लागली की , रात्रीच्या अंधारातून आपल्या समोरच्या झाडीतून मोठी थोरली कुमक मराठ्यांनी गडावर नेली. दोघेही सरदार थक्क झाले , सुन्न झाले , गप्प झाले , गप्पच राहिले. कारण ही आपली फजिती आपणच कशी कुणाला सांगायची! अन् जर गडाच्या उत्तर पायथ्याशी असलेल्या दिलेरखानाला ही फजिती समजली , तर तो संतापेल. अन् काय करील याचा नेम नाही , हे ते दोघे ओळखून होते. म्हणून गप्पच बसले.
तो दिवस मावळला. रात्र झाली. तोफा उडतच होत्या. अस्वलानं शिकावं तशा.
गडाच्या बाले किल्ल्यावर याच रात्री एक भयंकर धाडसी कवटाळ किल्लेदाराने योजले. त्याने चाळीस मावळ्यांना सज्ज केले. मोगलांच्या उडणाऱ्या तोफांवरच झडप घालण्यासाठी केवढे धाडस! या चाळीसातील काहींच्या जवळ टोकदार मोठे लोखंडी खिळे आणि हातोडे होते. ही सशस्त्र टोळी दख्खन दरवाजाच्या दिंडीतून गुपचूप बाहेर पडली. झाडीतून लपत छपत तोफांकडे उतरू लागली. या छाप्याची कल्पनाही दाऊद आणि रसूल यांना आली नाही. या मराठ्यांनी एकदम अंधारातून येऊन मोगलांवर झडप घातली. मोगलांचा गोंधळच उडाला. झटापट पेटली. हातोडेवाल्या मावळ्यांनी गर्दी करून तोफांच्या छिद्रात खिळे घातले. घाव घातले. तोफा क्षणात निकामी झाल्या. काम झाले. मावळे जितक्या झपाट्याने आले तितक्याच झपाट्याने झाडीत पसार झाले. चार सहा मावळे मारले गेले.
दख्खनची दिंडी उघडली गेली. मावळे किल्ल्यात शिरले. दिंडी बंद झाली. खानाच्या तोफा ठार बंद पडल्या होत्या. काळगडावर मावळी कुमक पोहोचली. आज आपल्या तोफा बेकाम होऊन निपचित पडल्या. तोबा!
या गोष्टी लपून राहिल्या नाहीत. दिलेरखानाला त्या समजल्या. तो आगीसारखा भडकला. संतापून तो या बंद पडलेल्या तोफांच्याकडे दौडत आला. दाऊद आणि रसूल गुन्हेगारासारखे मान खाली घालून उभे होते. संतापलेल्या दिलेरखानाने आपला क्रोध शब्दात उधळावयास सुरुवात केली. अत्यंत कठोर भाषेत दाऊद आणि रसूल यांची तो अब्रू सोलून काढीत होता. थांबतच नव्हता. तो त्यांना बेवफादार , हरामखोर , नालायक , बत्तमीज अशा घनघोर शिव्यांनी झोडपीत होता. कितीतरी वेळ.
त्यांनी दोघांनी तरी किती ऐकून घ्यायचे ? जबाबदारी त्या दोघांवर होती हे खरं. पण आता त्याबद्दल किती शिव्या घालायच्या ? अखेर एक क्षण असा आला की , दाऊदखान कुरेशीने मान वर करून दिलेरखानालाच जाब विचारला , ‘ तुमच्याच छावणीत दारूगोळ्याचा सारा साठा भडकून उडाला , कोण जबाबदार होतं त्याला ? आम्ही ? की तुम्ही ?’
दाऊदचा सवाल मुँहतोड होता. अन् मग! दाऊदखान आणि रसूल बेग यांची लांब दुसऱ्या छावणीत बदली करण्यात आली! ते परिंड्याच्या किल्ल्याकडे रवाना झाले. पुरंदर झुंजतच होता.
… क्रमश.